उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! विश्‍वंभर भटजींची गोष्ट

Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

गेल्या महिना अखेरची गोष्ट आहे. फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यमात माझ्या दोन मित्रांची मते वाचायला मिळाली. त्यातही गंमत अशी, ही नंतर आलेल्या मताला तीन दिवस आधीच एका मित्राने जणू उत्तर देऊन ठेवलेले होते. पहिला मित्र बालाजी सुतार कवी, साहित्यिक आहे आणि निरागस पुरोगामी आहे. त्याने म्हटले आहे, ‘की माझ्या राजकीय विचारांशी अजिबात न जुळणारी मते बाळगून असलेले, माझे ज्येष्ठ मित्र भाऊ तोरसेकर, अश्विनी मयेकर आणि समवयस्क आशिष चासकर, संदीप पटेल आणि आणखीही अनेक मित्रांना माझ्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. माझी अनेक सुखदु:खं मी यांच्याशी शेअर करतो. आमची परस्सरविरोधी मते आमच्या मैत्रीच्या आड येत नाहीत, येणार नाहीत.’ तर दुसरा मित्र सुनील तांबे. त्याने तीन दिवस आधी एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले होते, ‘हिंदुत्त्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट, थोडक्यात सर्व वादी लोकांना आपल्याला जे माहीत आहे तेच पुन्हा पुन्हा वाचायला हवं असतं!’ यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की सहसा ज्या विचारांना आपण बांधील असतो, त्याचेच गुणगान आपल्याला ऐकायचे असते. ते गुणगान योग्य असो किंवा नसो, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. साहजिकच त्याचेच प्रतिबिंब सोशल माध्यमात पडलेले असते. तिथेही विविध विचारांची डबकी तयार झालेली आहेत आणि मग आपल्याला हवे तसे कोणी लिहीले असेल, तर त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव होत असतो. कुठलेही तारतम्य बाळगण्याची अशा लोकांना गरज वाटत नसते. त्यातही तुम्ही जितके पक्के बांधील वा निष्ठावंत असता, तितके टोकाच्या भूमिका व भाषेला बळी पडत असता. त्यामुळे कोणीही उगाच सुसंस्कृतपणाचा वा परखड असण्याचा आव आणण्याचे काही कारण नसते. आपण कसे अस्सल पशूचे वंशज आहोत त्याची भाषिक साक्ष देण्यात कोणी कसूर करत नाही.

दांभिकपणा हे कुठल्याही संस्कृतीचे अविभाज्य अंग असते. जिथे संस्कृती नसते, तिथे सत्याला तत्काळ स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा पुरेपूर भरलेला असतो; पण एकदा संस्कृतीची वस्त्रे अंगावर चढवली, मग माणूस अधिकाधिक हिंसक व अमानुष होऊ लागतो. जितके तुम्ही अधिक उच्चसंस्कृतीच्या वर्गात पुढे सरकत जाता, तितके तुम्ही खोटारडे व दांभिक होत जात असता. त्याची शेकड्यांनी उदाहरणे आहेत. वैचारिक स्वातंत्र्य वा संयमाची भाषा बोलणारे अधिक असहिष्णू होत जात असतात. आपल्यापेक्षा इतर कोणीही विचार वा गुणानी हीन दर्जाचा आहे, अशी समजूत पक्की होत जाते, तसतसा माणूस सुसंस्कृत होत जातो. साहजिकच त्याला आपला सुसंस्कृतपणा सिद्ध करण्यासाठी इतरांना रानटी वा असंस्कृत ठरवण्याची सातत्याने उबळ येऊ लागते. किंबहुना इतरेजनांना वा आपल्याशी भिन्न मते असलेल्यांना रानटी, सुमार वा नगण्य ठरवण्याची प्रत्येक संधी अशी माणसे शोधू लागतात. डॉ. विश्‍वंभर चौधरी यांनी हल्ली आपल्या सुसंस्कृत असण्याला जागतिक मान्यता मिळवण्याचा वसा घेतलेला आहे. साहजिकच त्यांनी तसे बोलणे, वागणे अपरिहार्य आहे. म्हणूनच मी त्यांच्या लिखाण वा बोलण्याची फारशी दखल घेत नाही पण अलीकडे त्यांनी सोशल माध्यमात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका पुरस्कारासंबंधी आपले निरीक्षण प्रसिद्ध केले आणि त्याची दखल मला घ्यावी लागली. याचे कारण ज्या पुस्तकाला तो पुरस्कार मिळालेला आहे, त्याची प्रस्तावना मीच लिहिलेली आहे. बाकी नाही तरी त्याची प्रस्तावनाच चौधरी वा तत्सम बुद्धीमंत सुसंस्कृत लोकांचा उहापोह करणारी आहे. त्यामुळेच या विषयाकडे वळणे भाग झाले आहे. खरे तर साहित्य वा साहित्य संस्था हा चौधरींचा प्रांत नाही, तरी त्यांनी ‘मसाप’ या संस्थेच्या एखाद्या निर्णयात नाक कशाला खुपसावे?

सच्चिदानंद शेवडे हे मुलत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत आणि त्यांनी एका दैनिकाच्या साप्ताहिक स्तंभातून लिहिलेल्या लेखांचे पुस्तक करण्यात आले. त्याचे नाव ‘सेक्युलर्स नव्हे, फेक्युलर्स’! अशा पुस्तकाला स्तंभलेखनाचा पुरस्कार मसापने दिला, तर त्या पुस्तकाची लायकी काय, ते तपासूनही बघणे चौधरी यांना आवश्यक वाटले नाही. तेही स्वाभाविक आहे. त्यांच्या संस्कृतीने निषिद्ध मानलेल्या गोष्टी तपासून बघण्याची काहीही गरज नसते. त्यांच्या तथाकथित अभिजन वर्गाने ज्याला अस्पृष्य मानले आहे, त्याला हात लावून कशाला विटाळ करून घ्यायचा? परस्सर अशा कुठल्याही व्यक्तीला वा त्याच्या कृत्याला पापकर्म ठरवणे, हेच तर उच्चभ्रूपणाचे लक्षण असते. साहजिकच चौधरींनी तत्काळ शेवडे यांच्या पुस्तकाला पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेला शिव्याशाप देत पुरस्काराचाच उद्धार करून टाकला. यात नवे काय आहे? शंभर सव्वाशे वर्षापूर्वी त्याच पुण्यातले लोकमान्य टिळक गव्हर्नरला भेटायला गेले आणि तिथे त्यांनी चहा बिस्कुटे खाल्ली असे ठरवून पुण्याच्या ब्रह्मवृंदाने यापेक्षा काय वेगळे केले होते? बुद्धीवंत असलेल्या टिळकांनाही ‘धर्म बुडवला’ म्हणून पर्वतीला जाऊन ब्रह्मवृंदाने प्रायश्‍चित्त करायला लावले नव्हते काय? त्याला पर्यायच नसतो. पुण्यातला तो ब्रह्मवृंदच त्या काळात सुसंस्कृत व उच्चभ्रूवर्ग होता. आजचा ब्रह्मवृंद बदलून गेला आहे, तो हातात पळी पंचपात्री घेऊन आन्हिके करीत नाही. ते हाती लेखणी घेऊन वा टोळीबाजी करून तोच वारसा चालवित असतात. तेव्हाच्या ब्रह्मवृंदाचा असा ‘समज’ होता की गव्हर्नरच्या घरी गेले म्हणजे बिस्कुटे खाल्लीच असणार आणि बिस्कुटे खाल्ली म्हणजे धर्म बुडालेलाच असणार. साहजिकच टिळकांवर भडीमार सुरू झाला आणि इतके पक्के ब्राह्मण असूनही आपले उच्चभ्रू वर्गातले स्थान टिकवण्यासाठी लोकमान्यांनी निमूट पर्वतीला जाऊन प्रायश्‍चित्त घेतले होते.

आता थोडे विश्‍वंभर भटजींकडे वळू! ते म्हणतात, ‘‘माझा तर अलीकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबु, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद!’’ थोडक्यात एका संस्थेविषयी आपण नुसत्या ‘समजावर’ आधारित मतप्रदर्शन करीत आहोत, याचीच त्यांनी कबुली दिली आहे. हा अर्थातच त्यांचा दोष किंवा त्रुटी नाही. ती त्यांची गुणवत्ता आहे. कारण कशातले काहीही ठाऊक नसताना पांडित्य बेधडक सांगण्याचा हव्यास असल्याखेरीज कोणीही आजकालच्या पुरोगामी ब्रह्मवृंदाचा सदस्य होऊ शकत नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी असेच आपले सर्कसविषयक ज्ञान प्रदर्शित केले होते. त्यांच्या बालपणी सर्कशीतही प्रेक्षक उभे राहून त्यातल्या कसरतपटूंना टाळ्या वाजवायचे. आता तशा टाळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकन संसदेत मिळाल्यावर विश्‍वंभर भटजींना बालपणीची सर्कस आठवली! पण तसाच काहीसा प्रकार अण्णा हजारे वा त्यांच्यासोबतचा विश्‍वंभर भटजींचा ब्रह्मवृंद विविध धरणी व आंदोलने करतात, तिथेही होत नसतो काय? दिल्लीच्या जंतरमंतर वा रामलीला मैदानावर ‘अण्णा सर्कस’ जमलेली होती, तेव्हा कोण कशाला टाळ्या पिटत होते? अमेरिकन संसदेत वाजलेल्या टाळ्या आणि रामलीला मैदानावरची सर्कस यात कोणता गुणात्मक फरक होता? तर अण्णांच्या सर्कशीला विश्‍वंभर भटजींचे पौरोहित्य लाभलेले असते आणि मोदींच्या अमेरिकेन संसदेतील भाषणाचे पौरोहित्य करायला, यापैकी एकाही पुरोगामी भटजीला कोणी बोलावले नाही किंवा हिंग लावून विचारले नाही. साहजिकच तुमचाआमचा लग्नसोहळा म्होतुर लावणे असते आणि विश्‍वंभर भटजींचे पौरोहित्य लाभले, मग विवाह संपन्न होत असतो. म्हणजे त्यांचा तसा ‘समज’ आहे. एकदा समजावर जगायचे ठरवले, मग तिरस्कारही पुरस्कार होऊन जाणे स्वाभाविक नसते का?

सदरहू पुस्तकाला मसापने पुरस्कार दिल्याने भटजींना पुरोगामी विश्वात खळबळ माजल्यासारखेही वाटलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. स्वत: विश्‍वंभर भटजीच चिडले असतील तर विश्‍वभर खळबळ माजणारच ना? नुसता अनुस्वार काढून टाकला की विश्‍वभर व्हायला कितीसा वेळ लागतो? ‘मसाप ही संस्था सरकारच्या तिजोरीतून मिळणार्‍या देणगीसाठी हयात आहे,’ असाही त्यांचा दावा असून त्याला त्यांनी ‘रमणा’ नाव दिले आहे. ‘समजात रमणा’रे विश्‍वंभर भटजी ज्या आंदोलन, चळवळीचे नेहमी दावे करीत असतात, त्यांना कायम देशी-विदेशी रमणा घेऊनच जगावे लागलेले नाही काय? अर्थात मसापला फडतूस ठरवण्यासाठी त्यांनी टिळक रोडवर करंदीकर वा पाडगावकर असे कवी दिसले नसल्याचा दावा केलेला आहे. खरे आहे. त्या रस्त्याला यापैकी कोणी दिसला नसेल कारण आजकाल टिळक रस्त्यावर कोणाला रमणा वितरित केला जात नाही, की दक्षिणाही वाटल्या जात नाहीत. त्याचे मोजके रस्ते आहेत. एक रस्ता अमेरिकेतला फोर्ड फाऊंडेशन रस्ता आहे आणि दुसरा रॉकफेलर फाउंडेशन रस्ता आहे. तिथे भरगच्च तुंबडी भरून रमणा वाटला जातो. बाकी किरकोळीतल्या दक्षिणा मंत्रालय रोड म्हणून मुंबईत आहे, तिथून मिळत असतात. त्यासाठी अनेक पुरोगाम्यांची झुंबड उडालेली असते. विश्‍वंभर भटजींची मुंजही झालेली नव्हती, तेव्हा त्या ‘रमणा’र्‍या रांगेत विजय तेंडुलकर उभे असल्याचे तत्कालीन प्रवचनकार निखीलशास्त्री वागळ्यांनी बखरीत लिहून ठेवलेले आहे. पण ते विश्‍वंभर भटजींना ती बखरही वाचायला सवड झालेली नसावी. रोजच्या रोज चॅनेलच्या यजमानांकडे त्याच त्या ‘सत्य’ नारायणाची पोथी वाचण्यातून सवड झाली नसेल, तर ‘रमणा’र्‍या रांगेत ताटकळणारे विजय तेंडुलकर केव्हा बघणार ना? सबब सत्य शोधण्यापेक्षा समजावर आधारित नारायणाचे प्रचवन करून विश्‍वंभर भटजी मोकळे झाले.

अशा शिव्याशापांमध्ये नवे काही नाही. 1996 सालात निखीलशास्त्रींनीही मुंबईच्या साहित्य संघाला असेच शिव्याशाप दिलेले होते. मुंबई मराठी साहित्य संघाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठला तरी पुरस्कार दिलेला होता, तर त्याच्या विरोधात हातपाय आपटत निखिलने ही संस्था म्हातार्‍यांची झाली असून, तिथे आमुलाग्र बदलाची आवश्यकता प्रतिपादन केलेली होती. ज्या विंदा व पाडगावकरांच्या सावल्या विश्‍वंभर भटजी टिळकरोडवर शोधत आहेत त्यांच्याच बरोबरीने वसंत बापट यांनी एक काळ मराठी कवितेच्या मैफली गाजवल्या होत्या. त्यांच्याच कविता व गीतांचे पठण करीत निखिलने राष्ट्र सेवा दलात पुरोगामीत्वाची ‘दीक्षा’ घेतली. त्याच बापटांनी 1996 सालात मुंबईत दादर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले, तर निखिलसह अनेक पुरोगाम्यांना पोटशूळ उठला होता, कारण त्याचे संमेलनाध्यक्ष मनोहर जोशी होते. त्याला विरोध करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचा घाट घातला गेला होता! पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वसंत बापटांचा जीर्णोद्धार तेव्हा निखिलनेही केला होता. त्यातलेच काही खरकटे उचलून आज विश्‍वंभर भटजी पक्वान्नाचे ताट बनवल्याचा आव आणत आहेत. त्यातले आरोप, शिव्याही जुन्यापान्या आहेत. त्याला पर्याय नसतो, कारण त्यांच्यापाशी सांगायला काही नवे नाही आणि बोलायला मुद्दे नाहीत. साहजिकच नुसते शिव्याशाप देण्यापलीकडे काय साध्य होऊ शकते? ज्या पोथ्या जुन्या झाल्या व त्याकडे कोणी ढुंकून बघायला तयार नाही, त्याचा बाजार उठल्यावर चालणार्‍या बाजाराला शिव्या देणेच हाती उरते. मग आपण घेतली ती दक्षिणा होती आणि समोरचा घेतोय तो ‘रमणा’ आहे, असली हेटाळणी अपरिहार्य असते. ज्यांच्या पूर्वजांनी फुले, शाहू महाराजांनी निंदानालस्ती करण्यात विद्वत्ता जपली त्यांचेच आजचे वंशज, त्याच महात्म्यांना देव्हार्‍यात बसवून पुन्हा पौरोहित्य आपल्याकडे राखण्याची धडपड करीत असतात कारण त्याचे पोटपाणी व उदारनिर्वाहच अशा भिक्षुकीवर अवलंबून असतो.

पुरोहितगिरी ही पापपुण्यावर आणि शुद्ध अशुद्ध असल्याच निकषावर चालत असते. यांनी कुणाला प्रतिगामी ठरवले नाही, तर यांच्या पुरोगामित्वाचा बाजार चालायचा कसा? असले दोष व आरोप शाहू महाराजांवर झाले, त्याचा पाढा वाचून त्यांनी चोख उत्तरे तेव्हाही दिलेली आहेत. तेव्हा महाराजांवर असेच तोंडसुख घेतले जात होते आणि तेव्हाचे तथाकथित सुसंस्कृत लोकच असे आरोप करून शिवाशिवीतले पुण्य सांगत नव्हते काय? तेव्हा महाराजांना शूद्र ठरवणारे आणि आज महाराष्ट्र साहित्य परिषदेला सुमार ठरवणारे, यांच्यात कुठला नेमका फ़रक आहे? महाराजांनी महाराला चहाचे हॉटेल काढून दिले व तिथे स्वत: चहा प्राशन केले, हा सुमारपणा होता. आज मसापने पुरोगाम्यांची मान्यता नसलेल्या लेखकाला पुरस्कार दिला तर जुनाच पोटशूळ उठलेला दिसत नाही काय? उच्चभ्रू कोण, वैदिकाचा मान कुणाला, ते कोणी ठरवायचे? साक्षात महाराजाने नव्हे तर त्याच्याच दक्षिणेवर जगणार्‍या तथाकथित ब्रह्मवृंदाने ठरवले पाहिजे. नसेल तर तुम्ही एकजात सगळे शूद्र असता. तत्कालीन वैदिकांनी शाहू महाराजांना शूद्र ठरवले होते. आजचे निखिलशास्त्री वा विश्‍वंभर भटजी मसापला सुमार ठरवित असतात. वर्णव्यवस्था कायम असते. मनुवाद सहज संपत नसतो. अस्सल ब्राह्मण्य असे कोंडीत सापडल्यावर चवताळून अंगावर येत असते. त्यामुळेच विश्‍वंभर भटजींचा थयथयाट समजू शकतो. तसा माझा ‘समज’ अजिबात नाही कारण मी त्यांना समजून घेऊ शकतो. तितका प्रयासही करण्याची सवड माझ्यापाशी आहे पण विश्‍वंभर भटजी वा त्यांच्या ब्रह्मवृंदाला कालबाह्य पोथ्यांमधून बाहेर पडायची हिंमत नाही किंवा नव्या जगाकडे डोळे उघडून बघायचे साहस नाही. त्यामुळेच त्यांच्या न केलेल्या तपस्येतूनही सामर्थ्य आत्मसात केल्याचे भास होतात आणि त्या सामर्थ्याच्या आधारे शाप देण्याची नाटके रंगवावी लागतात. साहित्याचा विषय आहे म्हणून गदिमांची आठवण होते. अशा वैचारिक कैद्यांविषयी त्यांनी लिहून ठेवलेले आहे.
उंबरातले किडे मकोडे
उंबरी करीती लीला
जग हे बंदीशाला

भाऊ तोरसेकर
सुप्रसिद्ध पत्रकार
संपर्क: 9702134624

(पूर्वप्रसिद्धी, मासिक ‘साहित्य चपराक’, जून २०१७/ दैनिक ‘संचार-इंद्रधनू पुरवणी’)

टीम चपराक

हे ही अवश्य वाचा